“लाख मोलाची माणसं” आणि “विचार तरंग” या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न
तळेगाव दाभाडे :
अनंत देशपांडे लिखित “लाख मोलाची माणसं” आणि “विचार तरंग” या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ नुकताच योगीराज सभागृह येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सा. अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे मावळ शाखेचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय गोपाळघरे, प्रकाशिका अनिता देशपांडे उपस्थित होते.
मोरेश्वर होनप यांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्रद्धा बहुलेकर यांनी प्रार्थना सादर केली. अमित देशपांडे , रश्मी देशपांडे, आरुष देशपांडे , आरव देशपांडे, अनंत बवरे, अंजली बवरे आदींनी मनोगते व्यक्त केली.
डॉ. दत्तात्रय गोपाळघरे म्हणाले, “सामान्य माणसांमध्ये असामान्यत्व शोधणारे अनंत देशपांडे यांच्या पुस्तकामध्ये अशी कितीतरी दिग्गज व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो. रोजच्या आयुष्यात येणाऱ्या साध्या प्रसंगात दडलेला गर्भितार्थ देशपांडे यांनी मार्मिकपणे शब्दबद्ध केला आहे.”
सुरेश साखवळकर म्हणाले, “व्यक्तिचित्रण करणे हे तितके सोपे काम नाही. कारण दुसऱ्यामधले चांगले गुण शोधणे हा गुण आजकाल दुर्मिळ होत चालला आहे. मात्र अनंत देशपांडे यांनी अनेक शब्दचित्रे रेखाटली आहेत. तसेच “विचार तरंग” या पुस्तकात स्फुटलेखांचे उत्कृष्ट नमुने आहेत. त्यांच्या या दोन्ही पुस्तकांमधून वाचकांना निश्चितच प्रेरणादायी आहेत.”
डॉ. अनंत परांजपे म्हणाले, “या पुस्तकांच्या विक्रीतून येणारी रक्कम कलापिनी संस्थेला देणगी म्हणून दिली जाणार आहे. यातून देशपांडे कुटुंबियांची दानशूरता कळते. या पुस्तकांचा अधिकाधिक वाचकांनी लाभ घ्यावा.”
डॉ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. रश्मी देशपांडे यांनी आभार मानले. केदार अभ्यंकर यांनी
ध्वनीनियोजन केले.. आणि प्रशांत देसाई याने क्षणचित्रे टिपली
आरव आणि इशान या दोन कुमारांनी गंध लावून, गुलाब पुष्प देवून आणि “जयश्रीराम” म्हणून अभ्यागतांचे स्वागत केले. या दोघांनी स्टेजवरही उत्स्फूर्तपणे काम केले. त्यांनी केलेल्या कामाचे उपस्थितांनी कौतुक केले.






