*पिंपरी येथे 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांचा पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सत्कार*
पिंपरी :
औद्योगिक शिक्षण मंडळाच्या सभागृहात झालेल्या समारंभास आमदार अमित गोरखे, संस्था अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, पिंपरी चिंचवड मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, यशस्वी ग्रुप अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, टास्क फोर्स प्रमुख डॉ. दत्तात्रेय बाळसराफ, प्राचार्य डॉ. ललित कानोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविक: राजन लाखे यांनी केले.
मराठी साहित्य, संस्कृती, कला आणि साहित्य संमेलनाच्या एकंदरीत टप्प्यांचा आढावा घेत पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, की विश्वास पाटील यांची 99 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे मराठी साहित्याला एक नवी दिशा मिळाली आहे. ते लिहिते बोलते साहित्यकार आहेत. त्यांच्या साहित्यामुळे महाराष्ट्राचा दुर्लक्षित इतिहास समोर आला. पानिपत, झाडाझडती नंतर महानायक ही महाभारताच्या तोडीसतोड साहित्यकृती आहे. मराठी मातीतील शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असल्याने मराठी साहित्याला चांगले दिवस आणि दिशा मिळेल, असा विश्वास प्रभुणे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि औद्योगिक शिक्षण मंडळातर्फे पाटील यांचा सत्कार करताना प्रेरणादायी अनुभूती मिळाली असल्याचे ते म्हणाले.
सत्कारास उत्तर देताना विश्वास पाटील यांनी त्यांच्या साहित्यिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला. मोबाईलच्या चक्रव्यूहात सापडलेल्या तरुणाईने नवीन तंत्राचा वापर मंत्रासारखा करावा, असे आवाहन केले. ते म्हणाले, मोबाईल च्या नादात घरे घरे राहिली नाहीत. अनेकजण घरातील एकमेकांशी बोलत नाहीत. तंत्राचे गुलाम होऊ नका. त्यासाठी माय मराठीचा वापर आपली संस्कृती, प्रकृती आणि चैतन्य यासाठी करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेवर आधारित त्यांच्या आगामी आस्मान भरारी या साहित्यकृतीवर भाष्य केले. साहित्य परिषद आणि औद्योगिक शिक्षण मंडळाने केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी अमित गोरखे, डॉ. संदीप पाचपांडे, विश्वेश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. दत्तात्रेय बाळसराफ यांनी आभार मानले.






