पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी आंदोलकांना अखेर न्याय मिळाला – रविंद्र भेगडे
वडगाव (मावळ )
२०११ साली तात्कालीन आघाडी सरकारने बंदिस्त पवना जलवाहिनी विरोधात आंदोलन केलेल्या ११७ आंदोलकांवर सूडप्रवृत्तीने खोटे गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी तब्बल २७ आंदोलक दरम्यानच्या काळात मयत झाले.
मावळ तालुक्याचे भाग्यविधाते, मा.आमदार स्व.दिगंबर दादा भेगडे आणि खासदार स्व.गजाननजी बाबर हे देखील आंदोलकांमध्ये शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लाऊन लढले. त्यांचेही आज स्मरण या ऐतिहासिक निकालानंतर होत आहे.
ही कायदेशीर लढाई तब्बल १३ वर्षे आम्ही सर्वांनी मिळून लढली आणि आज सर्व आंदोलक शेतकऱ्यांची न्यायालयाच्या प्रक्रियेतून निर्दोष सुटका झाली हा एकप्रकारे नियतीचा न्याय आहे.
मावळ तालुक्यातील नैसर्गिक संसाधनावर सर्वांत पहिला हक्क येथील स्थानिक भूमिपुत्रांचा आहे. आमच्या मावळवासीयांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या बंदिस्त पवना जलवाहिनीला विरोध कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे हे मी निक्षून सांगतो.
१३ वर्षांपूर्वी आम्ही मावळ वासियांनी मिळून जो लढा उभारला त्यामुळे आजही पवनेचे पाणी मावळातील शेती-वाडी फुलवत आहे. जो पर्यंत बंदिस्त जलवाहिनी हा विषय कायमस्वरूपी बासनात जात नाही तोपर्यंत मी आणि माझे संपूर्ण मावळवासी शांत बसणार नाही हा शब्द देतो.