*संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक: नेतृत्व कायम, पण संचालक मंडळात मोठ्या बदलांचे संकेत* *बिनविरोध निवडणुकीसाठी सर्वपक्षीय सहमती*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे, २२ मार्च – मावळ-मुळशी तालुक्यातील प्रतिष्ठेची बनलेली संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत सहमती दर्शवली आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडेल, यावर सर्वपक्षीय शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तथापि, संचालक मंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या मागणीमुळे काही फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

*संचालक मंडळात नव्या चेहऱ्यांची मागणी*

 

आमदार सुनील शेळके यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाला आव्हान दिल्याचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, शेळके यांनी हे स्पष्ट केले की, “नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाचा आदर असून, फक्त नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी सर्वसामान्य सभासदांची इच्छा आहे.” परिणामी, विद्यमान संचालकांपैकी काहींना माघार घ्यावी लागेल का, याबाबत उत्सुकता आहे.

*राजकीय दबाव आणि समन्वयाची गरज*

निवडणुकीसाठी २१ जागेकरिता विक्रमी १९५ अर्ज दाखल झाल्याने नवले यांची डोकेदुखी वाढली होती. मात्र, पक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर समन्वय साधत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांच्या वतीने निरीक्षक सुरेश घुले, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, माजी मंत्री बाळा भेगडे, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांची उपस्थिती होती.

Advertisement

*राजकीय समीकरणे आणि भविष्यातील दिशा*

कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी अपक्ष म्हणून मागील विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे आगामी राजकीय समीकरणे काय राहतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवारांनी २५ मार्चपर्यंत माघार घ्यायची आहे. जर हे शक्य झाले, तर नानासाहेब नवले यांचे अध्यक्षपद कायम राहणार असून, संचालक मंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश होणार आहे.

*कारखान्याचा प्रगतीशील इतिहास*

नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने मोठी भरारी घेतली आहे. पहिल्याच गळीत हंगामात राज्यात अव्वल क्रमांक पटकावल्यापासून ते नुकत्याच कार्यान्वित झालेल्या ९२ कोटींच्या इथेनॉल प्रकल्पापर्यंत कारखान्याने प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडले आहेत. या यशात शरद पवार, अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांचे योगदान राहिले आहे.

संत तुकाराम साखर कारखान्याची आगामी निवडणूक बिनविरोध करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असून, नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाला सर्वपक्षीय समर्थन मिळाले आहे. मात्र, संचालक मंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी आणि राजकीय समीकरणे पाहता, ही निवडणूक केवळ कारखान्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण मावळ तालुक्यातील राजकारणाला नवा कलाटणी देणारी ठरणार आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page