कलापिनी आयोजित बालनाट्य शिबीर समारोप उत्साहात संपन्न प्रशिक्षणार्थींचा अभिनय, नृत्य, नाट्य, गायन,संगीत, बौद्धिक खेळातून व्यक्तिमत्व विकास
तळेगाव दाभाडे :
कलापिनी आयोजित बाल नाट्य शिबिराचा सांगता समारोप उत्साहात पार पडला. शिबीराचे हे ३४ वे वर्ष होते. शिबीर समारोप कार्यक्रम कै.कल्पना अरविंद करंदीकर स्मृती पुष्प म्हणून सादर करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शिका अंजली कऱ्हाडकर, अरविंद करंदीकर, डॉ अनंत परांजपे, डॉ. अनिश भट, अंजली सहस्रबुद्धे, अशोक बकरे आदी मान्यवर उपस्थित होते. . प्रास्ताविक आणि शिबिराची माहिती लीना परगी यांनी सांगीतली. त्यानंतर अंजलीताईंच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या मुलांनी अतिशय सुरेख असे रंगमंचीय अविष्कार पालक आणि प्रेक्षकांसमोर सादर केले.
अभिनय, नृत्य,नाट्य, गायन,संगीत, बौद्धिक खेळ, थिएटर गेम्स, कथा वाचन , कविता ह्या कलांनी परिपूर्ण असलेल शिबीर मुलांबरोबर प्रशिक्षकांना खूप काही शिकवून गेले. सभाधीटपणा, वक्तृत्व, अभिनय इत्यादीचा अभ्यास आणि प्रशिक्षण मुलांना मिळाले. अंजलीताई यांच्याबरोबरच विनायक लिमये, जयेश हुलावळे, विराज सवाई, मयुरी जेजुरीकर, माधुरी ढमाले कुलकर्णी, डॉ विनया केसकर, सुप्रिया खानोलकर आणि रिद्धी पाटणकर या तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मुलांना मिळाले.
असो तुला देवा माझा सदा नमस्कार ही प्रार्थना,अँक्शन / रिअॅक्शन्स, “चांदोबा पाण्यात पडला”हे नाटुकलं सादर केलं . रेडिओ कलापिनी ह्यामध्ये रेडिओवर कसे बोलावे, कार्यक्रम कसे करावेत, मुलाखत कशी घ्यावी हे मुलांनी उत्तमरित्या सादर करून दाखवले.
अंजलीताई कऱ्हाडकर मनोगतात म्हणाल्या की, मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव द्या. प्रत्येक गोष्ट त्यांना करू द्या. डॉ. अनंत परांजपे म्हणाले. “प्रत्येकाने एक तरी कला जोपासा. कलेमुळे आयुष्यात संकटप्रसंगी तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागणार नाही.”
अरविंद करंदीकर यांनी आवर्जून समारोपाला हजर राहून मुलांना आणि प्रशिक्षकांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाला प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिश भट हे पालक आणि पाहुणे म्हणून उपस्थित होते . त्यांनी सांगितले, कला ही मेंदूच्या प्रगतीसाठी औषध असते, त्यामुळे मन, शरीर कसे तंदुरुस्त राहते.
छोट्या गटातील स्वरा वालझाडे आणि मोठ्या गटातील देवांशी कुंभार ह्या दोघींनी आपली मनोगते व्यक्त केली. वरदराज लेले आणि प्राजक्ता बेल्हेकर ह्या पालकांनी सुद्धा मनोगते व्यक्त करून शिबीरामुळे मुलांना कसा फायदा झाला हे सांगून आनंद व्यक्त केला. उबंटू गाण्यावरच्या नाचाला मुलांनी वन्समोअर मिळवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली पाटणकर यांनी केले. आभार प्रदर्शन मधुवंती रानडे यांनी केले. रामचंद्र रानडे आणि श्रीपाद बुरसे यांचे शिबीरासाठी सहकार्य लाभले.
कलापिनीच्या कार्याध्यक्ष अंजली सहस्रबुध्दे यांचे शिबीर आयोजनासाठी मार्गदर्शन लाभले. शिबीर समन्वयक म्हणून लीना परगी यांनी अतिशय उत्तम रितीने जबाबदारी सांभाळली. ऋचा पोंक्षे, मधुवंती रानडे,सुचिता कुलकर्णी, केतकी लिमये, नंदिनी काळे, स्वाती इंगळे, जान्हवी पावसकर, कौस्तुभ ओक, अजय चौधरी यांचे खूप मोठे सहकार्य त्यांना लाभले.
सुमेर नंदेश्वर ह्यांनी ध्वनी संयोजन केले तर फोटोग्राफी हितेश शिंदे यांची होती. सांगता समारोपासाठी प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.






