जगतगुरु संत तुकाराम महाराजाची पालखी तब्बल १७ वर्षानंतर आळंदी मार्गे देहूत परतणार
देहूगाव : तब्बल १७ वर्षांनंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पुन्हा एकदा आळंदी मार्गे देहू नगरीत परतणार आहे. ही ऐतिहासिक माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.श्रीसंत तुकाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र देहूगाव येथे आपला ३५ दिवसांचा प्रवास संपवून पुन्हा देहू नगरीत २१ जुलैला येणार आहे. यंदा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष व संत ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० वे जयंती वर्ष व श्री संत तुकाराम महाराजांचे ३७५ वे वैंकुठगमण वर्षाचा दुग्धशर्करा योग असल्याने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने ११ जुलै २०२५ रोजी श्री संत तुकाराम महाराज संस्थानला आपण २० जुलै २०२२५ रोजी आळंदी येथे पालखी मुक्कामी आणावी असे निमंत्रण दिले होते. याचा स्विकार करून श्री संत तुकाराम महाराज संस्थानने २० जुलैला आपला आळंदी मुक्काम निश्चित केला यासाठी पालखी सोहळा प्रमुखांनी पुण्यातील एक मुक्काम कमी करून १९ जुलैला पालखी नेहमीच्या मार्गाने पिंपरीगांव येथे विठ्ठल मंदिरात मुक्कामी येणार असून २० जुलैवा पालखी सकाळी भोसरी मार्गे आळंदीकडे मार्गस्थ होईल. २० जुलैला मुक्काम करून पालखी डुडुळगाव, मोशी, टाळगाव चिखली, तळवडे, विठ्ठलनगर मार्गे देहूत २१ जुलैला दुपारी २ वाजता दाखल होईल. २००८ साली अखेरच्या वेळेस पालखी आळंदी मार्गे देहूला आली होती. त्यावेळी चिखली व टाळगाव परिसरातील नागरिकांनी भव्य स्वागत केले होते. यंदाही ही परंपरा जपली जाणार आहे.पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर डुडुळगाव, मोशी, चिखली, तळवडे या गावांतील भाविक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक प्रसंगी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, तसेच पालखी प्रमुख दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, इत्यादींनी पालखीचे शिस्तबद्ध, भक्तिपूर्ण आणि पारंपरिक स्वागत करण्याचे आवाहन केले आहे.





