*भाषा अभिव्यक्तीला आकार देते – डॉ. अरुण कोळेकर* कृष्णराव भेगडे यांच्या समग्र जीवन कार्याचा आढावा घेणाऱ्या मावळमाया या व्यक्तिपत्रकांचे अनावरण संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :-

 

भाषेमुळे साहित्याची निर्मिती होते आणि साहित्याची एक स्वतंत्र भाषा असते. साहित्यातून जगण्याचे आणि जीवनाचे दर्शन घडत असते आणि त्यामुळे समाज प्रगती करतो. भाषा ही मानवी अभिव्यक्तीला आकार देत असते असे मत जेजुरी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. अरुण कोळेकर यांनी व्यक्त केले. येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन व संस्थेचे माजी अध्यक्ष शिक्षण महर्षी, मावळभूषण मा.आ. कृष्णराव भेगडे यांच्या कार्याचा आढावा घेणारे मावळमाया या भितीपत्रकांच्या अनावरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्ष म्हणून इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे उपस्थित होते. प्रसंगी मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे, हिंदी विभागप्रमुख डॉमधुकर देशमुख, मराठी विभागाचे डॉ. संदीप कांबळे, प्रा. सत्यजित खांडगे, विविध विषयांचे शिक्षक व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. कोळेकर म्हणाले की, भाषेमुळे समाज बांधला जातो. भाषा ही शिकण्याची गोष्ट आहे आपल्याला स्वतःची पहिली ओळख आपल्या मातृभाषेतूनच होते सध्याच्या डिजिटल युगात मराठीचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये होत असल्याने तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्याने याच्यामध्ये करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भाषा ही रोजगार निर्माण करणारी मोठी गोष्ट आहे तसेच भाषेमुळेच आपल्याला लेखन वाचनाचे खरे सुख आणि आनंद मिळतो असे म्हणून त्यांनी भाषेतील विविध करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना सांगितल्या.

Advertisement

आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे म्हणाले की, आज समाजात लेखन वाचनाची आवड कमी होताना दिसत आहे मात्र अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये लेखन वाचनाचे संस्कार रुजवण्याचे काम शिक्षकांचे आहे. साहित्यातून विरेचनाचे सामर्थ्य तयार होते म्हणून त्याचे महत्त्व जास्त आहे.

महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी आम्ही कायम बांधील असून आमचा विद्यार्थी समाजात जाताना समाजाची योग्य प्रतिनिधित्व करेल याची कायम खबरदारी घेत असल्याचे डॉ. मलघे म्हणाले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.विजयकुमार खंदारे यांनी केले. आपल्या प्रस्ताविकातून डॉ. खंदारे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच याप्रसंगी मावळ माया या भित्तिपत्रकाच्या आयोजनामागील मराठी विभागाची व महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी संस्थेचे माजी अध्यक्ष मावळभूषण मा.आ.कृष्णराव भेगडे यांच्या कार्याचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. सत्यजित खांडगे यांनी केले. याप्रसंगी मावळ माया भित्तिपत्रके तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संपादक मंडळाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास काकडे तसेच संस्थेचे कार्यवाह श्री चंद्रकांत शेटे यांनी शुभेच्छा दिल्या.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page