वेदनांचे चेहरे टिपणारी मलघे यांची कविता कालजयी – श्रीपाल सबनीस कविराज उद्धव कानडे स्मृती पुरस्कार प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांना प्रदान
तळेगाव दाभाडे:
बुद्ध, आगरकर, बाबासाहेब, बसवेश्वर या महापुरुषांच्या मूल्यांवर श्रद्धा ठेवून संविधानाला अभिप्रेत असलेली जीवननिष्ठा हे कविराज उद्धव कानडे यांच्या जगण्याचे मर्म होते. त्यातून प्रसवलेल्या त्यांच्या कवितांनी मराठी साहित्य विश्वाला समृद्ध केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद येथे आयोजित कविराज उद्धव कानडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक सुनिताराजे पवार, कार्यवाह अंजली कुलकर्णी, रजनी कानडे, नारायण सुर्वे अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते
डॉ. सबनीस म्हणाले की, वेदनांचे चेहरे टिपणारी प्राचार्य मलघे यांची कविता कालजयी असून, घामाचे आणि श्रमाचे मोल जाणणारी आहे. त्यांच्या कवितेतून मानवी जीवनातील दैन्य, दुःख, दारिद्र्य, बदलती समाजव्यवस्था अशा आजच्या वास्तवाचे दर्शन घडते. कानडे आणि मलघे यांचे बहरलेले मैत्र मराठी नवकवितेला वेगळेपण देणारे ठरले.
अध्यक्षीय भाषणात मिलिंद जोशी म्हणाले, की उद्धव कानडे यांनी जे जगले तेच त्यांनी लिहिले आणि जे भोगले तेच लिहिले म्हणून त्यांच्या कवितेला वेगळे परिमाण लाभले. डॉ. मलघे यांची या पुरस्कारासाठी निवड सर्वार्थाने योग्य असून त्यांनी आपल्या कवितेतून मानवी वेदनांचे चेहरे.
दरम्यान, सुनिताराजे पवार, अंजली कुलकर्णी, सुदाम भोरे यांनीही उद्धव कानडे यांच्या आठवणी जागवल्या. सूत्रसंचालन प्रा. सत्यजित खांडगे यांनी, तर आभार राजेंद्र वाघ यांनी मानले.






