वाघजाई मंगल कार्यालयात भव्य शेतकरी मेळावा : रिंग रोड व टीपीएस स्कीम रद्द करण्याचा ठाम निर्धार
मावळ :

वाघजाई मंगल कार्यालय येथे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) यांनी प्रास्तावित केलेल्या 65 मीटर रिंग रोड (बाह्य वळण मार्ग) आणि नगररचना टीपीएस स्कीम रद्द करण्याच्या मागणीसाठी भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यात दारुंबरे, सांगवडे, गोडुंबरे, साळुंबरे, धामणे आणि नेरे या गावांतील जवळपास एक हजार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात सर्व शेतकऱ्यांनी टीपीएस स्कीम आणि रिंग रोड संपूर्ण रद्द करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
यावेळी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहत,
“रिंग रोड आणि टीपीएस संपूर्ण रद्द करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहीन,” असे आश्वासन दिले.
तसेच मावळचे लोकप्रिय आमदार श्री. सुनील आण्णा शेळके यांनी ठाम भूमिका घेत,
“टीपीएस व रिंग रोड या दोन्ही योजना शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आहेत. या दोन्ही योजना रद्द होणारच आणि मी संपूर्णपणे शेतकऱ्यांसोबत आहे,” असे स्पष्ट आश्वासन दिले.
मेळाव्यात शेतकऱ्यांची एकजूट आणि लढाऊ वृत्ती पाहायला मिळाली. घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सूर्यकांत सोरटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सांगवडेचे सरपंच श्री. रोहन जगताप यांनी मानले.






