रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाच्या छायेत देहूतील संत तुकाराम विद्यालयातील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपला स्नेहमेळावा 42 वर्षानंतर सुद्धा एका झाडाखालीच संपन्न केला
देहू :
रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाच्या छायेत देहूतील संत तुकाराम विद्यालयातील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपला स्नेह मेळावा 42 वर्षानंतर सुद्धा एका झाडाखालीच संपन्न केला ही महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट असून सर्वांनाच प्रेरणा देणारी बाब आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते आणि विचारवंत प्रा. प्रदीप कदम यांनी केले. प्रा. प्रदीप कदम रयत शिक्षण संस्थेच्या 1983 एसएससी बॅचच्या स्नेह मेळाव्यात बोलत होते. हा मेळावा श्रीक्षेत्र देहू येथील काळोखे मळ्यातील मळगंगा मातेच्या मंदिराच्या आवारात निसर्गरम्य ठिकाणी संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक प्रदीप कदम यांचे उद्भोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे असिस्टंट पोलीस कमिशनर सतिष कसबे, उद्योजक दत्तात्रय येळवंडे, आर्मी अधिकारी दत्ता चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. प्रदीप कदम यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे नियोजन सुरेश भाऊ काळोखे, कैलास काळोखे, अशोक काळोखे, सुनील झेंडे, प्रमोद मोरे, आदी मान्यवरांनी केले होते.
समाजाला आदर्श द्यायचा असेल तर असे मिळावे घेऊन आपल्या सुखदुःखांवर चर्चा होत असताना भविष्यातील पिढीवर सुद्धा चर्चा होते हे महत्त्वाचे असते. घातपाताच्या कारवाया करणाऱ्यांच्या संघटना होतात मग आपल्यासारख्या सुविचारी, सुशिक्षित, आणि वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या यशस्वी नागरिकांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत आपल्या आयुष्यातील आनंद वाढवला पाहिजे असेही प्रा प्रदीप कदम म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश काळोखे आणि निवेदन प्रमोद मोरे यांनी केले तर पंडित यांनी आभार व्यक्त केले. यावेळी 1983 च्या एसएससी बॅचमधील अनेक विद्यार्थ्यांची मनोगते झाली. या कार्यक्रमात स्नेह भोजन आयोजन करण्यात आले होते. 42 वर्षानंतर सर्वजण जेष्ठ आहेत. तरीही हे सर्व विदयार्थी आणि विदयार्थिनी मुंबई, सांगली, नाशिक, कोल्हापूर, पुणे शा वेगवेगळ्या ठिकाणाहून या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित होते. सर्वांच्या मनमुराद गप्पा रंगल्या होत्या.