तळेगाव एमआयडीसीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे ४१ कोटींचा निधी मंजूर, कामाच्या निविदा प्रक्रियेलाही सुरुवात
तळेगाव दाभाडे : दि. ४,
तळेगाव एमआयडीसी फेज १, फेज २ यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कामाचा मोठा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) या रस्त्याच्या कामासाठी तब्बल ४० कोटी ९० लाख ७६ हजार ७२६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
या निर्णयामुळे तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, कामगार तसेच परिसरातील नागरिकांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.रस्त्याच्या कामास मंजुरी मिळवून देण्यासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष,उद्योजक रामदास काकडे,आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी सभापती निवृत्ती शेटे,उद्योजक संजय साने पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम यांच्यासह स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
*ई-निविदा प्रक्रिया सुरू*
एमआयडीसीच्या पुणे प्रकल्प विभागाने जाहीर केलेल्या ई-निविदेनुसार –
* तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा १ व २ यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कामासाठी ₹ ३१,२०,३५,८८८ खर्च होणार आहे.
* तर टप्पा १ मधील अशुद्ध पाणी ऊर्ध्व जलवाहिनीच्या सेवा रस्त्याचे (मंगरुळ रस्ता) आणि जॅकवेल रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी ₹ ९,७०,४०,८३८ खर्च अपेक्षित आहे.
* निविदा प्रक्रिया ४ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे.
*ग्रामस्थांच्या आक्रमक आंदोलनाचा परिणाम*
गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी तळेगाव एमआयडीसी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. ह्युंदाई, एल अँड टी, इमरसन यांसारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. वाहतूक कोंडीतून बाहेर पडताना अनेकदा अपघात घडले असून, १५ नागरिकांचा मृत्यू तर शेकडो जण जखमी झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर नवलाख उंब्रे येथे ग्रामस्थांची मोठी सभा झाली होती. यात ११ ऑगस्टपासून एमआयडीसी बंद व बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. स्थानिक जनतेच्या आक्रमक भूमिकेमुळे शासन व एमआयडीसी प्रशासनाला अखेर जाग आली असून, रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे.
*स्थानिक नेत्यांची भूमिका*
या रस्त्यासाठी मागील आठ वर्षांपासून ग्रामस्थ व उद्योजक सातत्याने पाठपुरावा करत होते. आमदार सुनील शेळके व बाळा भेगडे यांनी विविध स्तरांवर पाठपुरावा केला, तर रामदास काकडे, शांताराम कदम आदींनी ग्रामस्थांना एकत्र करून प्रशासनावर दबाव टाकला.
*नागरिकांची अपेक्षा*
या रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे, वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, तसेच औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात, अशी अपेक्षा नागरिक व उद्योजकांनी व्यक्त केली आहे.






