पवना नदीत पोहायला गेलेल्या पुण्याच्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू; थुगाव येथील घटना
पवन मावळ तालुक्यातील थुगाव परिसरात पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्याच्या तीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि ३ मे २०२६ रोजी दुपारी घडली असून, स्थानिक बचाव पथके आणि ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनंतर तिन्ही तरुणांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत.
मावळ तालुक्यातील दोन दिवसात हि तिसरी घटना आहे या आधी जाधववाडी धरणात ३ साळुंब्रे येथे १ तर लोणावळा येथे १ जणाचा बुडून मृत्यू झाला आहे
प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव, आयान शेख (सर्व राहणार: पुणे) अशी मृत तरूणांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हे मित्र फिरण्यासाठी मावळमधील थुगाव परिसरात आले होते. पवना नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे इतर दोन मित्रही पाण्यात ओढले गेले आणि तिघांचाही बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्था’ आणि ‘शिवदुर्ग मित्र लोणावळा’ या बचाव संस्थांच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. निलेश संपतराव गराडे, अनिल आंद्रे, पिंटू मानकर, कैसर शेख, भास्कर माळी, विनय सावंत, गणेश गायकवाड, रवी कोळी, राजू सय्यद, अनिश गराडे, पोलीस पाटील धनंजय पोटफोडे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. या पथकाने मोठ्या परिश्रमानंतर तिन्ही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले.
सुटीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या या तरुणांवर काळाने झडप घातल्याने थुगाव परिसरात आणि पुण्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही पर्यटकांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे अशा दुर्घटना घडत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.






