कोंढवा पोलीस ठाण्याचा “आंधळा कारभार” तलाठ्यावर खोटा गुन्हा दाखल! नोकरीवर रुजू नसणाऱ्या तलाठ्यावरच गुन्हा दाखल! तलाठी संघटना काम बंद आंदोलन करणार…
कोंढवा
पुणे
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोंढवा बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 66/1 या सातबारा वारस नोंद प्रकरणी हवेलीतील कोंढवा पोलीस ठाण्यात दादासाहेब झंजे या तलाठ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वारस नोंदीचा फेरफार केला एका तलाठ्याने मात्र गुन्हा दाखल झाला दुसऱ्याच तलाठ्यावर यामुळे कात्रज- कोंढवा भागात महसुल विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खोटा गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात खळबळ
उडाली आहे. दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल पुणे जिल्यातील तलाठी व मंडल अधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले आले. महसुल खात्यातील कोणत्याही कर्मचाऱ्यावर अथवा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी
जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असताना त्यांच्या परवानगीशिवाय तलाठ्यावर गुन्हा कसा दाखल झाला? पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी एवढी घाई का केली? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करताना मा. जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी असणे गरजेचे असताना संबंधित पोलीस ठाण्याने गुन्हा कसा दाखल झाला आणि तोही चुकीच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल का केला?
तसेच गुन्हा दाखल केलेल्या तलाठी यांना कोणतीही लेखी अथवा तोंडी कल्पना न देता तसेच कोणतीही चौकशी नोटीस न देता गुन्हा दाखल केल्याने याबाबत संशय निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149, 150 अन्वये कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून तत्कालीन तलाठी अर्चना वनवे यांनी कोंढवा बुद्रुक येथील सर्वे क्रमांक 66/ 1 मध्ये फेरफार क्रमांक 38915 यांची वारस नोंद टाकली असता सर्व कागदपत्रांची पूर्तता असल्याने ती मंडलाधिकारी व्यंकटेश चिरमुलला यांनी मंजूर देखील केली. यावेळी मात्र गुन्हा दाखल झालेले तलाठी दादासाहेब झंजे यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. फेरफार मंजुरीची सर्व प्रक्रिया कायदेशीर मार्गे पार पडली असताना गुन्हा दाखल कसा झाला? याबाबत पुणे जिल्हा तलाठी संघ शाखा हवेली तालुका पुणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसात दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यात नाव आलेले कोंढव्यातील ग्राम महसूल अधिकारी श्री. दादासाहेब झंजे यांचे नाव तात्काळ कमी करावे अन्यथा दोन दिवसात सर्व पुणे जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी हे बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे.
यावरुन सदरील गुन्हा पोलिसांनी किती अभ्यासपूर्वक दाखल केला आहे यातून कोंढवा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे?
प्रतिक्रिया 1)
सदरील फेरफार नोंद ही वारसांनी दिलेल्या कागदपत्रांच्या, वारस प्रतिज्ञा पत्राच्या आधारावर कोंढवा बुद्रुक येथील सर्वे क्रमांक 66 /1 मध्ये फेरफार क्रमांक 38 915 फेरफार टाकून दिलेला होता. कागदपत्रांची पूर्तता
असल्याने व वारस नोंदीचा फेरफार असल्याने सदर कागदपत्रांच्या आधारे तो फेरफार नियमानुसार टाकण्यात आलेला आहे.
अर्चना दिनकर वनवे
तत्कालीन तलाठी
कोंढवा
प्रतिक्रिया 2)
सदरील कोंढवा भागातील फेरफार हा नियमानुसार तलाठी यांनी कागदपत्रांच्या आधारावर नोंद भरलेली होती. त्याची मुदत ही 15 दिवसांची असते. मुदत संपल्यावर तो फेरफार रीतसर मंजूर करण्यात आला आहे. जर याबाबत कोणाला काही तक्रार होती तर त्यांनी त्या मुदतीत तलाठी कार्यालयात रीतसर तक्रार करायला हवी होती परंतु कोणतीही तक्रार मिळाल्याने तो फेरफार मंजूर करण्यात आला आहे.
सर्व कागदपत्रांची पूर्तता असल्याने व वारस नोंदीचा फेरफार असल्याने सदर कागदपत्रांची तपासणी करून फेरफार मंजूर झालेला आहे.
व्यंकटेश रामचंद्र चिरमुल्ला तत्कालीन मंडल अधिकारी कोंढवे खुर्द
प्रतिक्रिया 3)
माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे हे सकाळी मला वर्तमानपत्रात बातमी आल्यानंतर मित्राच्या फोनवरून कळाले. मी बातमी वाचताच मला आश्चर्याचा धक्का बसला. ज्या बाबतीत गुन्हा दाखल झाला आहे त्या ठिकाणी मी त्यावेळी नोकरीसाठी रुजू देखील झालो नव्हतो, अशावेळी माझ्यावर गुन्हा दाखल होतो, हे मला धक्कादायक होते.
सर्व मीडियात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मला मित्रांचे, नातेवाईकांचे खूप फोन आले. ज्या प्रकरणाशी माझा काहीही एक संबंध नसताना पोलिसांनी गुन्हा कसा दाखल केला? का दाखल केला? याबाबत मला अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असा डोळे झाक पणा करून आंधळेपणाने गुन्हे दाखल होत असतील तर पोलीस प्रशासनावर सर्वसामान्यांनी कसा विश्वास ठेवायचा?
दादासाहेब झंजे
तलाठी