विद्यार्थ्यांनी देशसेवेबरोबरच उत्तम तंत्रज्ञान आत्मसात करावे. – श्री. रामदास काकडे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेत रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष रो. केशवजी मनगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
तळेगाव दाभाडे:

“देशाला मोठे करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे याचे भान ठेवावे लागेल. आपण ज्या शाखेत शिकता, जो व्यवसाय करता, जे जे काही करतात त्यात भरारी घ्या. आपल्यात एकता नाही. जातीपातीच्या पलीकडे आपली मजल जात नाही. टेक्नॉलॉजीला लवकर स्वीकारत नाही. म्हणून चीन सारखा देश आज प्रगतीपथावर गगन भरारी घेत आहे. आपल्यात फिनिक्स पक्षासारखी गगन भरारी घेण्याची ताकद आहे, हे विसरता कामा नये. विद्यार्थ्यांनी देशसेवेबरोबरच उत्तम तंत्रज्ञान आत्मसात करावे.” असे उद्गार इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे यांनी काढले. ते काल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष म्हणून रो. केशवजी मनगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विविध पदाधिकारी, रोटरी क्लब ऑफ निगडीचे माजी अध्यक्ष रो. सुहास ढमाले कार्यवाह, चंद्रकांत शेटे, विलास काळोखे, हरीशभाई वनवारी, रणजीत काकडे, बीएसएफचे कॅप्टन कणकराज, कॉन्स्टेबल विराट गुप्ता, प्राचार्य डॉ. संभाजी मलगे, डॉ. संजय आरोटे, डॉ. गुलाब शिंदे, डॉ. साहेबराव पाटील, उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले, काव्या अकॅडमीचे संचालक शंकर हुरसाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपले अध्यक्ष भाषणात केशवजी मनगे म्हणाले की, “आई वडील शिक्षकांचे संस्कार आपल्या पाठीशी असतील तर यशाला सहज गवसणी घालता येते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे केवळ स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन म्हणून साजरे न करता देशाला समृद्ध करण्यासाठी आपण पावले उचलली पाहिजे. देशाचे नेतृत्व करणारी तुमची भावी पिढी आहे. शिक्षणाचा केवळ नोकरीसाठी उपयोग न करता देशसेवेसाठी कसा करता येईल, याचाही विचार प्रत्येक विद्यार्थ्याने केला पाहिजे. सोशल मीडियावर आजची जग चालले आहे. पर्यावरण, आर्थिक समृद्धता देशसेवा याची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे. आपला भारत देश समृद्ध करता येईल आपण एक आहोत ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे.”
पुढे बोलताना काकडे म्हणाले की, “जपान, रशिया, युक्रेन, चीन, अमेरिका आदी देशांची अर्थव्यवस्था, औद्योगिक प्रगती यांचा लेखाजोखा आपण तपासला पाहिजे असेही ते आपल्या भाषणात म्हणाले.”
यावेळी कॅप्टन कनकराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या भूमीबद्दल गौरव उद्गार काढत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या घोडदौडीचा आढावा मांडला. ४० विद्यार्थ्यांवर सुरू करण्यात आलेल्या महाविद्यालयात आज विविध ज्ञानशाखांच्या माध्यमातून पाच ते सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष उद्योजक रो. केशव मनगे यांच्या कार्याचा गौरव करत यशोदा महादेव काकडे काॅलेज ऑफ इंजीनियरिंगला सी.एस.आर च्या माध्यमातून अद्यावत कॉम्प्युटर लॅब उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि शिवणे व नवलाख उंब्रे येथील शाळेला मदत केल्याबद्दल त्यांच्या आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. राजाराम डोके यांनी मानले.






