दारिद्र्य अडचणी याच जीवनाचे खरे सौंदर्य : डॉ. सुनील धनगर हिंदमाता व्याख्यानमाला पुष्प दुसरे
तळेगाव दाभाडे :

दारिद्र्य, अडचणी याच जीवनाचे खरे सौंदर्य आहेत. दिवसभर एकही समस्या उद्भवली नाही, तर तुमची दिशा चुकली असे समजावे. संकटांना सामोरे गेलो तरच आपले जीवणगाणे सुरेल करू शकतो, असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. सुनील धनगर यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथील हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त ‘हिंदमाता व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. सुनील धनगर यांनी गुंफले. त्यांनी ‘जीवनगाणे गातच राहावे’, या विषयावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरंग कलानिकेतन संस्थेचे अध्यक्ष राजीव कुमठेकर हे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. रवींद्रनाथ दाभाडे, अध्यक्ष विभावरी दाभाडे, रवि आचार्य, साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे, बाळासाहेब शिळीमकर, शिवाजीराव पवार, प्रा. रेवाप्पा शितोळे, मधुकर शिंदे, राहुल पारगे, सुधाकर देशमुख, प्राचार्य श्रीकृष्ण मोहिते, संचालक अनिल वेदपाठक, राजेश सरोदे, देवराम वाघोले, नामदेवराव आंद्रे, प्रकाशराव गायकवाड आदी उपस्थित होते.
डॉ. धनगर म्हणाले, की आपण जीवनात दिशा शोधण्याचे कार्य केले, तर आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा मिळते. वाचनाचा आनंद घेतला पाहिजे. शब्दात प्रचंड ताकद असते. शब्दच आयुष्याचे सोने करतात, तसेच विचारवंत, संतांचे विचारही आनंदी जीवनासाठी महत्त्वाचे आहेत. आज अनाथ आश्रम वाढण्याऐवजी वृद्धाश्रम वाढताहेत ही चिंतेची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. धनगर यांनी यावेळी त्यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखवला. शून्यातून विश्व निर्माण कसे करावे, हे स्वतःच्या आयुष्याच्या उदाहरणातून सांगितले. आव्हानांना न घाबरता ध्येय कसे गाठावे, यावर त्यांनी भर दिला. करिअर, आत्मविश्वास, जीवनातील संघर्षातून यशाकडे वाटचाल या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श करीत श्रोत्यांना खिळवून ठेवले.
सूत्रसंचालन सचिव कैलास भेगडे, प्रदीप टेकवडे, सुहास धस यांनी केले. आभार सूर्यकांत वाघोले यांनी मानले.






