गरीब, महिला, युवक व शेतकरी वर्गाला अनुकूल केंद्रीय अर्थसंकल्प – डॉ. हनुमंत शिंदे
तळेगाव दाभाडे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ साठी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणारा असून वित्तीय शिस्तीबरोबरच गरीब, महिला, युवक व शेतकरी वर्गाला प्रोत्साहन देणारा आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. हनुमंत शिंदे यांनी केले. तळेगाव दाभाडे येथिल इंद्रायणी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी आयोजित केलेल्या एक दिवसीय चर्चासत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. काशिनाथ अडसूळ, डॉ. सदाशिव मेंगाळ, डॉ. सत्यम सानप, डॉ. अर्चना जाधव तसेच अन्य विभागप्रमुख व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे तसेच कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. शिंदे म्हणाले की, २०४७ पर्यंत देशाला विकसित करण्याचे ध्येय असून त्यासाठी सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिलेला आहे. अनेक महत्वाच्या तरतुदींचा अंतर्भाव या अंदाजपत्रकात केला गेला असून वित्तीय तूट ५.७ टक्क्यांवरून वरून ५.१ पर्यंत व पुढील वर्षी ४.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. गरिबांच्या कल्याणासाठी मोफत अन्नधान्य, प्रधानमंत्री आवास योजना, पी एम स्वनिधी अंतर्गत पाथरी धारकांना अर्थसहाय्य यांसारख्या योजनांवर या बजेट मध्ये भर दिला आहे.
देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुद्रा योजनेच्या अंतर्गत ३० कोटींचे कर्ज महिला उद्योजकांना उपलब्ध करून दिले असून १ कोटी महिलाना बचत गटांच्या माध्यमातून ‘लखपती दीदी’ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांसाठी २१,२०० कोटी रुपयांची तरतूद या बजेट मध्ये करण्यात आली आहे. अन्नदाता शेतकऱ्यांसाठी ११.८ कोटी शेतकऱ्यांना पी एम किसान सन्माननिधी अंतर्गत थेट अर्थसहाय्य दिले जात असून त्यासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ४ कोटी शेतकऱ्यांना पी. एम. फसल विमा योजने अंतर्गत सुरक्षा कवच आणि ई-नॅशनल अग्रिकल्चर मार्केटिंग अंतर्गत १३६१ बाजारपेठा जोडण्यात आल्या असून त्याद्वारे ३ लाख कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. याशिवाय अमृत काळासाठी व्यूहरचना करण्यात आली असून या अंतर्गत शाश्वत विकासासाठी पुढील तरतुदींचा समवेश करण्यात आला आहे
१)पारंपरिक इंधनांऐवजी सी.एन.जी, पी. एन. जी. आणि बायोगॅस यावर भर.
२)१ कोटी कुटुंबाना रूफ टॉप सोलरायझेशेन द्वारे दरमहा ३०० यूनिट मोफत वीज.
३)सार्वजनिक प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी ई- वाहनांना प्रोत्साहन दिले जाणार.
४)पी. एम. उज्वला योजने अंतर्गत १० कोटी पेक्षा अधिक एल पी जी वाटप व ३६.९ कोटी एल. ई. डी. बल्ब, ७२.२ कोटी एल. ई. डी. टुब आणि २३.६ लाख ऊर्जा बचत करणारे पंखे याचे वाटप करण्यात आले आहे. ५)१.३ कोटी एल. ई. डी. पथ दिवे बसविण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. काशिनाथ अडसूळ यांनी केले. डॉ. अर्चना जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय आणि सूत्रसंचालन केले तर डॉ. सदाशिव मेंगाळ यांनी आभारप्रदर्शन केले.