*अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा भव्य पुरस्कार सोहळा!* *नामवंत कलाकार पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार!* *२० एप्रिल रोजी सायंकाळी अटल उद्यानात रंगणार पुरस्कार सोहळा*
*अंबरनाथ :* अंबर भरारी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित ९ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा भव्य पुरस्कार सोहळा येत्या २० एप्रिल रोजी रंगणार आहे. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती अंबर भरारीचे संस्थापक, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली आहे.
अंबरनाथ शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून अंबरनाथ शहरात आजवर अनेक नामवंत कलाकार घडले आहेत. त्यामुळे अंबरनाथचे नाव जगभरात पोहोचावे, या उद्देशाने ९ वर्षांपूर्वी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात करण्यात आली होती. मागील ९ वर्षात अनेक दिग्गज कलाकारांचा या चित्रपट महोत्सवात गौरव करण्यात आला असून यंदा २० एप्रिल रोजी दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सूर्योदय सभागृहाजवळील अटल उद्यानात हा पुरस्कार सोहळा रंगणार असल्याची माहिती या महोत्सवाच्या आयोजनात महत्त्वाचा वाटा असलेले डॉ. गणेश राठोड यांनी दिली आहे.
यंदाच्या वर्षी या चित्रपट महोत्सवात ५० चित्रपटांनी सहभाग घेतला होता. यापैकी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाने बाजी मारली असून या चित्रपटाला सर्वाधिक १५ मानांकने मिळाली आहेत. तर श्री गणेशा चित्रपटाला १२ मानांकने मिळाली असून सत्यशोधक आणि धर्मवीर २ या चित्रपटांना प्रत्येकी ११ मानांकने मिळाली आहेत. घोषित पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक म्हणून कांचन अधिकारी, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अभिनेता म्हणून मकरंद अनासपुरे, तर सर्वोत्कृष्ट लक्षवेधी भूमिकेसाठी धर्मवीर २ चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारे मकरंद पाध्ये यांना पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी दिली आहे.
*ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जीवन गौरव पुरस्कार!*
यंदाच्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर चित्रपट लेखक अनिल कालेलकर यांना कारकीर्द सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रसिद्ध सिने पत्रकार मंदार जोशी यांना सिने पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून तंत्र गौरव पुरस्कार विजय खोचीकर यांना देण्यात येणार आहे.
*अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन*
सिनेसृष्टीतील पुरस्कार सोहळे हे सहसा मुंबईत होतात. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यांना उपस्थित राहणे अंबरनाथच्या चित्रपट रसिकांना अनेक कारणांनी शक्य होत नाही. त्यामुळेच अंबरनाथकरांनाही चित्रपट पुरस्कार सोहळ्याचा आनंद घेता यावा, तसेच प्राचीन व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबरनाथ शहराचे नाव जगभरात पोहोचावे, या उद्देशाने हा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा मागील ९ वर्षांपासून अंबरनाथ शहरात आयोजित केला जात आहे. या सोहळ्याला सर्वांना विनामूल्य प्रवेश असून अंबरनाथकरांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चित्रपट निर्माते आणि अभिनेते निखिल सुनील चौधरी यांनी केले आहे.
——————————-