स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे :
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावनिक, उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ढमाले डेअरीच्या संचालिका कु. समृद्धी ढमाले मॅडम उपस्थित होत्या. तसेच श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष खांडगे सर, उपाध्यक्ष श्री दादासाहेब उऱ्हे ,सचिव श्री मिलिंद शेलार, सहसचिव व शालेय समिती अध्यक्षा सौ. रजनीगंधा खांडगे मॅडम, खजिनदार सुदाम दाभाडे, संचालक श्री श्रीराम कुबेर, सल्लागार कुसुमताई वाळुंज मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली व मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रेणू शर्मा यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “दहावी हा टप्पा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा वळण आहे. यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास या गुणांची जोपासना करा.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले क्षण यांचा भावपूर्ण शब्दांत उल्लेख करत मनोगत व्यक्त केले. सिया उमरिया, विवेक ढेंगळे , जीवक पवार , आदित्य पटेल , शर्वरी वीर,आणि सृष्टी चोपडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शाळेने दिलेल्या संस्कारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यालयाचे पर्यवेक्षक व दहावी ब चे वर्गशिक्षक श्री सिद्धेश्वर सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, “शिस्त, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक दृष्टीकोन या गुणांच्या बळावर तुम्ही निश्चितच उज्ज्वल भवितव्य घडवाल.
इयत्ता दहावीचे अ चे वर्गशिक्षक सचिन झेंडे यांनी आपल्या मनोगतात शाळेने दिलेले संस्कार आणि मूल्ये आयुष्यभर जपा. अपयश आले तरी खचू नका; प्रत्येक अपयश हे पुढील यशाची पायरी असते.” असे सांगितले.
यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री दादासाहेब उऱ्हे यांनीही विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान केली.
दादासाहेब उऱ्हे सर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना सांगितले की, “मेहनत आणि शिस्त या गुणांच्या बळावर तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचाल. प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जा.”
संस्थेचे सचिव मिलिंद शेलार सर विद्यार्थ्यांना म्हणाले, “वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळेच यश संपादन करता येते. मोठी स्वप्ने पाहा आणि त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा.”
शालेय समिती अध्यक्ष रजनीगंधा खांडगे मॅडम यांनी सांगितले, “शाळेने दिलेले संस्कार आयुष्यभर जपा. तुमच्या प्रगतीतच विद्यालयाचा अभिमान आहे.”
अध्यक्ष संतोष जी खांडगे सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आजचा निरोप हा शेवट नसून नव्या यशस्वी प्रवासाची सुरुवात आहे. तुम्ही केवळ विद्यार्थी नसून या विद्यालयाचे संस्कारमूल्य घेऊन पुढे जाणारे आदर्श नागरिक आहात. तुमच्या कर्तृत्वाने विद्यालयाचे नाव उज्ज्वल करा.” त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर इ.९ वी च्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन अत्यंत सुबक व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.
भावनांनी ओथंबलेला हा सदिच्छा समारंभ विद्यार्थ्यांच्या स्मरणात कायमस्वरूपी राहील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रेणू शर्मा , पर्यवेक्षक श्री सिद्धेश्वर सोनवणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. स्वामिनी धोत्रे, कु.आकांक्षा साळुंके यांनी केले व आभार प्रदर्शन विद्यालयाच्या शिक्षिका सौ. संध्या शिंदे यांनी केले.
याप्रसंगी श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष खांडगे सर, संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे ,सचिव श्री मिलिंद शेलार ,शालेय समिती अध्यक्षा व सहसचिव सौ रजनीगंधा खांडगे , कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे , यांनी या कार्यक्रमाची कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






