पवना धरणाचे मजबुतीकरण तातडीने सुरू करावे – ज्ञानेश्वर ठाकर यांची लोकशाही दिनी तहसीलदारांकडे मागणी
पवनानगर : पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्याला पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या पवना धरणाचे मजबुतीकरण तातडीने सुरू करावे, अशी मागणी ॲड. भरत ठाकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पवना बंद जलवाहिनी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतलेले ज्ञानेश्वर ठाकर यांनी लोकशाही दिनानिमित्त मावळ तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.
ठाकर यांनी निवेदनात नमूद केले की, पवना धरणाचे बांधकाम होऊन तब्बल ६५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. धरणाच्या कॉक्रीट भागातून गळती होत असल्याने दगड व मातीचा बंधारा तातडीने मजबूत करणे आवश्यक आहे. तसेच कांक्रीटीकरण बांध जिर्णावस्थेत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. या धरणाची क्षमता असूनही, मजबुतीकरण न झाल्यामुळे पाणी पूर्ण क्षमतेने साठवता येत नाही. त्यामुळे पाण्याचा अपुरा साठा आणि भविष्यातील संभाव्य धोक्यांचा सामना करावा लागतो. गेल्या २० वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने मजबुतीकरणाची कामे सुरू केली होती, मात्र धरणग्रस्तांच्या प्रश्नांचे निराकरण न झाल्याने ती कामे रखडली होती. जर धरणाच्या मजबुतीकरणाकडे दुर्लक्ष झाले तर हजारो नागरिकांच्या जीवितहानीचा धोका संभवतो, असा इशाराही ठाकर यांनी दिला.
या निवेदनात पवना धरणाच्या मजबुतीकरणाबरोबरच कोथुर्णे पुलाचे बांधकाम व रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच दुधीवरे मार्गे लोणावळा–पवनानगर बस सेवा सुरू करावी, पवनमावळमधील इतर प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशाही मागण्या करण्यात आल्या.
पवना धरणाची पार्श्वभूमी पाहता, हे धरण पवनमावळ खोऱ्यातील पवना नदीवर १९७२ मध्ये पूर्ण झाले. याच धरणातून पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरालाही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे धरणाची सुरक्षितता आणि पूर्ण क्षमतेने पाणी साठवण्याची हमी मिळणे नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ठाकर यांनी स्पष्ट केले.






