*कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी बुद्धिमत्तेची सांगड घालणे विद्यार्थ्यांची जबाबदारी- पंकज फणसे* इंद्रायणी महाविद्यालयात प्रथम वर्ष बीबीए, बीसीए चा स्वागत समारंभाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे -मानवी मेंदूची जडणघडणच अशी झालेली असते की आपण काम केल्यानंतर आपल्याला ती निर्मितीचे समाधान देत असते. आज कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या जाण्याची भीती न बाळगता बदलत्या संदर्भानुसार नवी कौशल्ये आत्मसात करून स्वतःला उभे करण्याबाबत विद्यार्थ्यांनी जागरूक असायला हवे असे मत तंत्रज्ञानाचे अभ्यासक व स्तंभलेखक पंकज फणसे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या बीबीए-बीसीए विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, विभाग प्रमुख प्रा. विद्या भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी पुढे बोलताना फणसे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विकासासाठी ज्ञान आत्मसात करावे. आज स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मानवी बुद्धिमत्ता हीच सरस असून मानवी मेंदूच्या क्षमतांना पर्याय नाही त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला न घाबरता विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेने त्याचा सामना करावा, असे फणसे म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात रामदास काकडे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे यश हे विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांचीही जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांसोबत पालकही सजग असतील तर बदलत्या जगाचा आवाका लक्षात घेऊन संधी निर्माण करणे आणि संधीचे सोने करणे विद्यार्थ्यांच्या आवाक्यात येऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे चांगले उद्योजक तयार होऊ शकतात असा विश्वास व्यक्त करत यावेळी रामदास काकडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे म्हणाले की, मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील भेद बारकाईने टिपून ते आपल्यापर्यंत विचारांच्या माध्यमातून पोहोचवताना विद्यार्थ्यांपर्यंत मौलिक विचार पोहोचविणे गरजेचे आहे. अल्गोरीदमच्या जगात तंत्रज्ञानाधारीत अवलंबित्व आलेले असताना त्याचा मानवी जगण्याशी असलेले अनुबंध वस्तुनिष्ठपणे समजून घेण्याची गरज असल्याचे मत डॉ. मलघे यांनी व्यक्त केले.
मान्यवरांचे स्वागत विभागप्रमुख प्रा. विद्या भेगडे यांनी केले. विद्यार्थ्यांना विभागाबद्दल पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून माहिती दिली. पालकांनी इंद्रायणी महाविद्यालय व या विभागातील शिक्षकांवर जो विश्वास ठेवला आहे, तो आम्ही सार्थ करू, तसेच , इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व व्यक्तिमत्व विकास यावर कायम भर देण्यात येतो असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्वी श्रीनिवास यांनी केले तर आभार प्रा. योगिता दहीभाते यांनी मानले.






