जीएसटी सुधारणांचे यश राहुल गांधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यालाच ! युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विशाल वाळुंज यांचे प्रतिपादन
*तळेगाव दाभाडे* : केंद्र सरकारने अलीकडेच लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मधील सुधारणांचे यश काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला द्यावे लागेल, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विशाल वाळुंज यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथे आयोजित शहर युवक काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते. यासंदर्भात बोलताना वाळुंज म्हणाले की, “राहुल गांधी यांनी गेल्या अनेक वर्षापासून जीएसटीच्या जटिल रचनेमुळे छोट्या आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) होणाऱ्या त्रासाबाबत सातत्याने आवाज उठवला होता. त्यांनी जीएसटीला ‘गब्बर सिंग टॅक्स’ असे संबोधत सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली होती आणि एकसमान व कमी कराची मागणी केली. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे आणि काँग्रेस पक्षाच्या सततच्या दबावामुळे सरकारला जीएसटीच्या दरांमध्ये सुधारणा करावी लागली.”
त्यांनी पुढे सांगितले की, राहुल गांधी यांनी २०२१ मध्ये तामिळनाडूमधील उद्योजकांशी संवाद साधताना ‘एक कर, किमान कर’ अशी संकल्पना मांडली होती. याशिवाय, त्यांनी जीएसटीच्या पाच करस्लॅबमुळे निर्माण होणारी गुंतागुंत आणि त्याचा छोट्या व्यापाऱ्यांवर होणारा परिणाम यावर सातत्याने भाष्य केले. “आज सरकारने जीएसटीच्या दरांमध्ये सुधारणा केल्या, ही बाब राहुल गांधींच्या दृष्टीकोनाची पुष्टी आहे,” असे वाळुंज यांनी नमूद केले.
“जीएसटी च्या जुन्या धोरणामुळे अनेक लघु आणि मध्यम उद्योग अडचणीत सापडले. अनेकांची रोजी रोटी यामुळे गेले आणि मोठे व्यापारी अधिक सक्षम झाले असे मत सम्राट कडोलकर यांनी व्यक्त केले. देशातील बेरोजगारीची मूळ जीएसटी दडले होते. उशिरा का होईना याकेंद्र सरकारने आता जीएसटीला अधिक लोकाभिमुख आणि व्यवसायस्नेही बनवावे, जेणेकरून छोटे व्यापारी, शेतकरी आणि सामान्य जनता यांना दिलासा मिळेल. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष यासाठी सतत लढत राहील.” असे एडवोकेट राम शहाणे म्हणाले. यावेळी अभिषेक गोडांबे प्रतीक बोर्डे निनाद हरपुडे विक्रांत वाळुंज यतीश रेडे हर्षद चव्हाण स्वप्निल साळवे सागर वाळुंज हर्षद उबाळे अमित मोकाशी नफीस खान गणेश कवडे राहुल फरांदे संभाजी शेडे रंगराव पाटील आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.






