तळेगावात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद
तळेगाव दाभाडे :
शहरातील सर्वच भागात गेल्या काही महिन्यापासून भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून या कुत्र्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात उच्छाद मांडला आहे. अनेक नागरिकांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असल्याच्या घटना घडल्या आहेत तर नाना भालेराव कॉलनी या ठिकाणी कुत्र्यांनी केलेल्या अस्वच्छतेमुळे अक्षरशः दुर्गंधी पसरली आहे. नाना भालेराव कॉलनी मध्ये रस्त्याच्या कडेला अनेक नागरिक कचरा टाकत आहे हाच कचरा भटके कुत्रे सर्व कॉलनी भागात पसरवत आहेत. साधारणपणे सहा वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेने कोट्यावधी रुपये खर्च करून कुत्र्यांची नसबंदी केली होती. नसबंदी केल्यानंतरही कुत्र्यांची संख्या कशी वाढली यासंदर्भात बोलताना तळेगावातील रहिवाशी गणेश भेगडे म्हणाले की पुणे मुंबई महामार्गावरील विजय मारुती खिंड या ठिकाणी पिंपरी चिंचवड भागातील एक वाहन रात्रीच्या वेळी येऊन भटकी कुत्रे सोडून जातात. त्यानंतर ही भटकी कुत्रे तळेगाव शहरात येतात त्यामुळे देखील तळेगाव दाभाडे शहरात कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. तरी नगरपरिषद प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत गणेश भेगडे यांनी व्यक्त केले आहे. रात्रीच्या वेळी वाहने व पायी चालणाऱ्या नागरिकांवर कुत्रे धावत जातात कुत्रे अचानक अंगावर आल्याने त्यांच्या तावडीपासून सुटण्यासाठी वाहन पळवताना किंवा पळताना अपघात घडलेले आहे. रात्री अंधारात व सुनसान रस्त्यावर नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागते आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच आहे त्यामुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात असून नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरही काहीही कारवाई होत नाही असे देखील अनेक नागरिकांनी सांगितले.






