सैनिक ही बोलायची गोष्ट नाही तर समजून घ्यायची गोष्ट : अनुराधा प्रभुदेसाई
तळेगाव दाभाडे :
देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणारे सैनिक कुठल्या परिस्थितीत लढतात, याचे भान आम्हाला असले पाहिजे. सैनिकांच्या आई वडिलांचा त्यागाचे मोल करता येणार नाही. त्यामुळे सैनिकांचा सन्मान करत त्यांच्यासारखे देशभक्त कसे होता, येईल याचा विचार करा, असे आवाहन लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभूदेसाई यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथील हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त ‘हिंदमाता व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना “तुमच्या ‘उद्या’साठी आपला ‘आज’ आज देणारा सैनिक” या विषयावर लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभूदेसाई यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. रवींद्रनाथ दाभाडे, अध्यक्ष विभावरी दाभाडे, अनुराधा प्रभुदेसाई, उमाकांत कुलकर्णी, रवि आचार्य, ऍड. श्रीराम कुबेर, नामदेव आंद्रे, संजय वाडेकर, लक्ष्मण माने, ऍड. मच्छिन्द्र गटे, सुधाकर देशमुख, सुधाकर देशमुख, पंढरीनाथ दाभाडे,दत्तात्रय कांदळकर आदी उपस्थित होते.
प्रभुदेसाई पुढे बोलताना म्हणाल्या, की आपण देशाचे देणे लागतो, ही भावना सर्वांमध्ये रुजली पाहिजे. सामान्य माणूस आणि सैनिक यांच्या विचारांमध्ये खूप मोठा फरक असतो. सैनिक ही बोलायची गोष्ट नाही, तर समजून घेण्याची गोष्ट आहे. आजच्या तरुणाईने समजून घेवून देशप्रेम जागृत ठेवले पाहिजे. सैन्यामध्ये कोणाचाही धर्म, जात किंवा पंथ बघितला जात नाही. सगळेजण एक सैनिक म्हणून एकत्र असतात. भारतीय सैन्य हाच सर्व सैनिकांचा धर्म असतो आणि सैन्यच सर्वांना महत्त्वाचे असते. कोणत्याही बटालियनचा सैनिक हा दुसऱ्या बटालियनच्या सैनिकांपेक्षा वेगळा नसतो. शिस्त हा समान धागा प्रत्येक सैनिकांमध्ये दिसून येतो. दुसऱ्यांप्रती आदर असणे ही सैनिकांमधील भावना अतिशय कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.
Advertisementअनेक लोकांच्या उदाहरणातून सैनिकांप्रति असलेली नैतिकता, त्यांच्या आई-वडिलांप्रति, देशाविषयी असलेल्या भावना, सीमेवरील खडतर आयुष्य आदींचा ऊहापोह केला. आसाम, कारगिल, नागालँड, दिमापुर आदी भागातील सैनिकाप्रतींच्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या थरारक अनुभव प्रभुदेसाई यांनी मांडला. १९७१ सालचे युध्द, कारगील युध्द आदी युध्दांचा इतिहास उलगडून सांगितला.
प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक ऍड. रवींद्र दाभाडे यांनी केले. २८ वर्षापूर्वी लावलेले रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. साठ कोटी रुपये ठेवी सभासद व हितचिंतकांनी संस्थेत ठेवून संस्थेवर विश्वास ठेवला आहे. तसेच अर्थकारण करता करता समाजकारण करून समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतो असे ऍड. दाभाडे यांनी सांगितले.
लोहगड – विसापूर विकास मंच संस्थेला हिंदविजय दुर्ग संरक्षक पुरस्कार प्रदान :
दुर्ग संवर्धन कार्याची दखल घेऊन लोहगड – विसापूर विकास मंच संस्थेच्या संस्थेच्याला ‘हिंदविजय दुर्ग संरक्षक पुरस्कार’ व अकरा हजार रुपये आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सचिन टेकवडे, विश्वास दौंडकर, अमोल गोरे, ओमकार मेंढी, महेश सोनपावले, गणेश उंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सूत्रसंचालन सचिव कैलास भेगडे, प्रदीप टेकवडे, सुहास धस यांनी केले. मानपत्र वाचन रेवाप्पा शितोळे यांनी केले. आभार राजेश सरोदे यांनी मानले.






