*पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा नवा धडा – अजित फाऊंडेशनच्या मुलांनी साकारल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती!* वालचंदनगर माजी विद्यार्थी मंडळाचा पुढाकार; शिल्पकार मुकुंद दातार यांचे मार्गदर्शन
तळेगाव दाभाडे :

“उत्सव साजरे करताना निसर्गाचा सन्मान हवा!” या विचाराने प्रेरित होऊन अजित फाऊंडेशनने वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवला. वालचंदनगर माजी विद्यार्थी मंडळ, पुणे यांच्या पुढाकाराने आणि प्रख्यात शिल्पकार मुकुंद दातार यांच्या मार्गदर्शनाखाली शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनवण्याची भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी प्रथमच आपल्या हातांनी शाडूमातीपासून गणेशमूर्ती घडवल्या. रासायनिक रंगांचा वापर न करता, पूर्णपणे नैसर्गिक शाडूमातीचा उपयोग करून त्यांनी आपल्या बाप्पांना साकारले. माझा बाप्पा या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या निर्मितीशी भावनिक नाते जोडले. या प्रक्रियेत त्यांनी सर्जनशीलतेचा आनंद अनुभवला. शाडूमातीच्या मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळतात, त्यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी होत नाही. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो. या कार्यशाळेने मुलांना केवळ कला शिकवली नाही, तर पर्यावरण जपण्याचे महत्त्वही पटवून दिले.

वालचंदनगर माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले आणि ही कार्यशाळा केवळ मूर्ती बनवण्यापुरती मर्यादित नव्हती, तर विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, डोळ्यांतील चमक आणि त्यांच्या मूर्तींशी असलेले भावनिक नाते पाहून मान्यवरांच्या प्रत्येकाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
याप्रसंगी अजित फाऊंडेशनचे महेश निंबाळकर, विनया निंबाळकर, सतीश थोरात आणि रेणुका थोरात हे उपस्थित होते.






