माणसांवर प्रेम करणारा मी कवी – नीतीन चंदनशिवे
तळेगाव दाभाडे:
“कविता जर जिवंत ठेवायची असेल तर आजीच्या मायेची कुशी, बापाच्या घामाचा वास ज्याला अत्तरासारखा वाटेल आणि स्वतःसाठी झटता झटता समाजासाठीही झटता आले तरच कविता जिवंत राहील. माणसांवर प्रेम करणारा मी कवी आहे,” असे गौरवउद्गार दंगलकार कवी नीतीन चंदनशिवे यांनी काढले. ते काल इंद्रायणी महाविद्यालय, मराठी विभाग आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरववडया’निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. विजयकुमार खंदारे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विभागाने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची माहिती व पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी महाविद्यालयातल्या विविध विभागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे चंदनशिवे म्हणाले की, पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली आहे. विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवणारी ही प्राध्यापकांची शेवटची पिढी असेल, असं म्हटले तर वावगे ठरू नये. खरी मराठी जगवली त्या ज्ञानोबा तुकोबांना आजची पिढी विसरत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. ‘कविता नोकरी आणि पुन्हा कविता’ यांचा प्रवास त्यांनी स्वानुभवातून उलगडून सांगितला. त्याचबरोबर वेगवेगळ्या कविता सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तीन महिने भुकेने व्याकुळ झालेलो आम्ही, एका कवितेने आमच्या भुकेचा प्रश्न मिटवला होता. हे सांगताना विद्यार्थी, प्राध्यापक अधिकच भावुक झाले. तर काहींच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या. मानवतेचे गीत गाणारा मी कवी असून मी जातीला चुना लावला आणि मी माणूस झालो असे सांगत ‘दंगल’ कवितेतून हिंदू मुस्लिम यांच्यात निर्माण झालेली तेढ आणि पुन्हा जुळलेली मने यावर भाष्य केले.
हातगाडीवर भाजीपाला विकणारा ते लाल परीने प्रवास करत गावोगावी फिरवून मानवतेची कविता गाणारा कवी म्हणून आज मला समाजाने डोक्यावर घेतलं याचा आनंद वाटतो, असेही ते म्हणाले

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे
यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नितीन चंदनशिवेची यांची कविता ही स्वानुभावातली कविता आहे. भावनिक, संवेदनशीलता आणि संघर्ष हा त्यांच्या कवितेचा आत्मा आहे. त्यांच्या कवितेने मराठी वाङ्मय
समृद्ध केले, असे सांगून डॉ. मलघे यांनी स्वतःची ‘चिंधी’ नावाची कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप रतन कांबळे यांनी केले तर आभार प्रा. सत्यजित खांडगे यांनी मानले.






