विज्ञानाशिवाय प्रगती अशक्य – संभाजी मलघे
तळेगाव दाभाडे :
“विज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर झाले असून विज्ञानाशिवाय प्रगती अशक्य आहे. विज्ञानामुळे आज माणूस जगाला गवसणी घालू शकला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विज्ञान मराठी भाषेतून समजावून सांगितले तर मराठी माणसाला आणखीन नव्या वाट्या सापडतील” , असे उद्गार इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी काढले. ते आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त संगणक शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संगणक शास्त्र विभागप्रमुख प्रा. निलेश गावडे, प्रा. दीपक साबळे, प्रा. आविष्कार कानवडे आदी उपस्थित होते.
प्रा. निलेश गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत कार्यक्रमाची रूपरेषा आणि विज्ञान दिनाची भूमिका स्पष्ट केली. संगणक शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनामध्ये हिरीरीने सहभागी होत मनोगत व्यक्त केले. तसेच विज्ञानातील गमतीजमती समजून घेण्यासाठी प्रश्नमंजुषा आणि खेळ या प्रात्यक्षिकाचे मुस्कान माशाळे आणि मुस्कान सोरेंग यांनी आयोजन केले होते. याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कु. अक्षता साबळे या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले तर कु. श्रुती गोडसे हिने आभार मानले.






